सातारा जिल्हा

शेरेवाडीतील दोन कर्त्या तरुणांचा बेपर्वाईमुळे हकनाक बळी : प्रभाकर देशमुख

प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता
Blog Image

दहिवडी : शेरेवाडीतील रणजीत मगर व अनिकेत मगर या दोन कर्त्या तरुणांचा बेपर्वाईमुळे हकनाक बळी गेला ही अतिशय दुर्देवी घटना असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केली.

शनिवार २४ ऑगस्ट रोजी काळ्या रंगाच्या स्कार्पिओ क्रमांक एम. एच. ११ डी. एन. ०१०० या वाहनाने माण तालुक्यातील शेरेवाडी येथे दुचाकीस ठोकरल्याने झालेल्या अपघातात शेरेवाडीतील दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या अनुषंगाने प्रभाकर देशमुख बोलत होते.

प्रभाकर देशमुख म्हणाले, प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या तक्रारीवरून हे दोन्ही मयत तरुण दुचाकीवरुन रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कडेने जात होते. मात्र भरधाव वेगात व अनियंत्रितपणे आलेल्या स्कार्पिओ गाडीने या तरुणांना त्यांच्या दुचाकीसह चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की यात दुचाकीचा चक्काचूर झालाच मात्र काहीही चुक नसताना दुर्दैवी रित्या या दोन्ही तरुणांचा बेपर्वाईमुळे हकनाक बळी गेला.

प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, या दोन्ही तरुणांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मयत रणजीत याचा मेकॅनिकल डिप्लोमा झालला होता. तो बारामती येथे भारत फोर्ज मध्ये काम करत होता. त्याचे मागील वर्षी लग्न झाले होते. त्याची पत्नी सुध्दा सुशिक्षित आहे. रणजीत हा घरातील कर्ता पुरुष असून त्याच्यावरच त्याचे संपुर्ण घर अवलंबून होते. वडील आजारी असून डायलिसीस करावे लागते. कमावता पुरुषच अपघातात गेल्याने हे घर उध्वस्त झाले आहे. तर अनिकेत हा सेंट्रिंगची कामे करुन उदरनिर्वाह करत होता. तो आपल्या आयुष्यात उभं राहण्याचा व घराला उभारी देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या अपघाताने त्याची सर्व स्वप्नं हवेत विरली.

प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, हे दोन्ही बळी बेपर्वाईचे आहेत. आमचं कुणी काही वाकडं करु शकत नाही ही प्रवृत्ती काहीजणांच्यात बळावू लागली आहे. पुण्यातील हे लोण माण तालुक्यात पोहचलं आहे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घेवून, चौकशी करुन कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. खरंतर अशा दुर्दैवी व दु:खद प्रकरणात पोलिसांची भूमिका सामंजस्याची, मदतीची आणि सहानुभूतीची असायला हवी. परंतू या अपघातग्रस्तांचे कुटुंबिय व नातेवाईक यांनी सर्वांसमोर सांगितले की पोलिस दमदाटीची व अरेरावीची भाषा करत होते. हे योग्य नाही.